द्रविडी प्राणायाम - दिवस आठवा

ऑक्टोबर १९:

पहाटे ०५:३० ची कन्याकुमारी - मुंबई मध्ये स्वार झालो. मनाप्रमाणे ट्रिप झाली होती. तिकीट काढल्यानंतर माझ्याकडे १५० रुपये उरले होते. आता मी २१ तारखेच्या ००:४० ला पुण्याला पोह्चीन. ४३ तास ट्रेनमध्ये काढायचे होते. पूर्ण प्रवासात वाचायला एकपण पुस्तक सोबतीला नसल्याने, मग आजूबाजूच्या प्रवाश्यांशी गप्पा मारून वेळ काढणे हा एक उपाय होता. गेले काही दिवस अगदी मनात येईल तसा फिरत होतो, ज्या क्षणाला जे वाटेल ते करून बघितलं. हेच मी एका planned trip वर आलो असतो, सगळा प्रवास आखलेला असता, तर ना मला राजर्षी सारखा माणूस भेटला असता, ना असला अनुभव घेता आला असता.

संध्याकाळपर्यंत pantry boy पासून ते प्रवाश्यांशी ओळख झाली होती. गप्पा रंगल्या कि मग वेळ कसा जातो ते समजत नाही. अधेमधे मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली असतांना "दारू - सिगरेट" black मध्ये आणून देणारे लोकंपण येत! इकडे रेल्वेकडून २०० रुपये दंड आहे, अन दुसरीकडे मला कोल्ड्रिंक घ्यावी तशी दारू मिळतेय! वाह आपल्या देशात काहीही होऊ शकतं.

ट्रेनमधे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक भेटतात, एक सह-प्रवाशी समाज कार्यकर्ते होते, त्यांच्याशी खूप विषयांबद्दल चर्चा झाली. एक डॉक्टर होता, खूप सिरीयस प्राणी होता तो. एक बँकर होते, हसमुख अगदी. एक आपल्या मुलाकडे जाणारी आजी. ह्या पूर्ण प्रवासात आम्ही सगळे गोवले गेलो होतो.

पुण्याहून निघताना मला कसलीच कल्पना नव्हती. कसे लोक भेटतील, काय होईल, या सर्व पैलूंकडे थोडं दुर्लक्ष केलं, तरी सेल्फ डिफेन्ससाठी एक कस्टम-मेड चाकू घेतला होता, पण त्याचं काम कधीच पडलं नाही. प्रवासात लुटण्याचे किस्से बरेच ऐकिवात येतात, त्यात एखादं शस्त्र असलं तर आधार मिळतो. सुदैवाने फिरणं सुरळीत झालं. कुठे कोणी ठग भेटला नाही, म्हणून केरळ आणि कन्याकुमारीच्या गोड आठवणी घेऊन मी आता माझ्या परतीच्या प्रवासावर होतो.

सगळे योग अगदी जुळून आल्यासारखे होते. "When you want something, all the universe conspires in helping you to achieve it." (आयुष्यात मी बऱ्याचदा ह्या Alchemistच्या वाक्याशी स्वतःला relate केलंय, त्यातलीच हि अजून एक वेळ.) बरंच अंतर मला माझी डेस्टिनी (का destination म्हणू?) माहित नव्हती, तिसऱ्या दिवशी कुठे माझा रूट निश्चित झाला. (हे तर अगदी माझ्या करियर सारखंच वाटतंय!) असो, आता ह्या ट्रेनच्या डब्यात मला माझ्या आजूबाजूचे काय बोलतायत काही कळत नाहीये. त्यामुळे जरी शोर-गुल्ला होता, मला शांतपणे तंद्री लाऊन बसता आलं. बॉस तंद्री लाऊन तासानतास बसण्यात काय मजा असते. बरेच महिने झाले, कधी शांत बसून मेंदूचं defragmentation केलं नाही. हळूच जाणीव झाली, अश्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. राहून गेलेल्या गोष्टींची लिस्ट नकळत वाढत असते, आणि मग जेव्हा त्यातलं काही करणं अगदी अशक्य होतं तेव्हा आपण त्याचे खयाली पुलाव बनवतो!

प्रवासाचे शेवटचे काही तास तर काही केल्या सरकत नव्हते. अखेरीस हा प्रवास संपला. ट्रेन मध्ये काढलेल्या ४३ तासात मी बरीच धूळ खाल्ली होती. आता रूमवर जाऊन बढीया गरम पाण्याने अंघोळ करावी, आणि आपल्या ह्या ट्रीपची victory साजरी करत एखादी सिगरेट पेटवावी! साधारण तासाभरांनी मी निवांत पडून झुरके घेत होतो.

हा पोस्ट द्रविडी प्राणायाम सिरीज मधला शेवटचा पोस्ट. बऱ्याच गोष्टी अनुभवल्या, पण सगळंच काही उमटतं असं नाही. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मलापण लिहण्याचा चेव चढला! बऱ्याच जणांना हि ट्रिप एक वेडेपण वाटेल. काही असो, मलातर असल्या ट्रिप पुन्हा पुन्हा मारायचा चस्का लागणार आहे.

Veendum kaanaam !!

आपला,
(मार्गस्थ) माचाफुको

8 प्रतिक्रिया:

हेरंब said...

माचाफुको, आम्हीही तुझ्याबरोबर केरळ, कन्याकुमारी फिरून आलो रे !! जबरी झालंय वर्णन.. मानला तुला !! जिओ !!

Anagha said...

मस्त केरळ, कन्याकुमारीची जालावर सहल झाली आणि २०११ मध्ये तरी निदान नक्की जाऊन येण्याचा निश्चय झाला. सुंदर. :) फोटो अप्रतिम आणि तुझी सहलीला निघण्याची पद्धतही अजब. मजा आली रे माचाफुको! आभार! :)

रोहन... said...

एकदम मज्जा आली. इतका भटकून देखील अशी तरीप माझ्या नशिबात आली नाही... किंवा मला करायला सुचली नाही...

प्रवास संपला पण 'एंडमे समझेगा' अश्या काही गोष्टी कळल्याच नाहीत... ;)

THEPROPHET said...

लई भारी माचाफुको!!!!!

rajiv said...

eager to see kanyakumari, but now with own eyes.

beautifully written and expressed, MACHAFUKO

Machafuko said...

धन्यवाद!!
पण एक आहे हां, तुम्हा सर्वांच्या comments मध्ये एक जादू आहे! मला पण लिहायला कसला चेव येत होता!
मुद्दाम तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर देत न्हवतो! दिवस पहिलाच्या प्रतीक्रीयांपासून ते दिवस आठव्याच्या प्रतिक्रिया वाचतांना, कसले बदल आलेत! waah तुम्हा सर्वांची साथ असल्याने मला पण लिहण्यात मजा आली!

अपर्णा said...

माचाफुको लई झ्याक.....अजून एक अशी ट्रीप एक कशाला अधे मध्ये दोन चार कर आणि आम्हाला पण सहभागी करून घे....:) शेवटी तुला पण खयाली पुलावची आठवण आलीच न??

स्वारी... मध्ये मी गायबले होते पण त्याचा फायदा मला इतरांसारखा वाट न पाहता समद यकदम वाचाया भेटल.....मजा आली....आणि खर पण वाटल....हीही...:)

सौरभ said...

अपर्णा धन्यवाद :D मीपण प्रचंड उत्सुक आहे त्याच्याबरोबर अश्या एखाद्या प्रवासाला जाण्यासाठी. :)

Post a Comment